Sunday, June 16, 2024

सुखदायक वेदना ❤️

              वेदना या कोणत्याही प्रकारात मोडल्या जाऊ शकतात. शरीराला झालेल्या दुखापतीमुळे होणारी वेदना, मनाच्या विरुद्ध गोष्टीमुळे मनाला होणारी वेदना आणि आपल एक काम पूर्ण होत असलेल्यांची एक उल्हासदायी वेदना, आता हे वेदना उल्हासदायी खरच असू शकते का ?

          उल्हास म्हणजे आनंद आणि उल्हासदायी वेदना म्हणजे वेदना होऊन सुद्धा मिळणारा आनंद. एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरिता मेंदूचा किंवा शरीराचा वापर होतो. एखादी गोष्ट मनात ठरवून ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती सोडायची नाही अश्याप्रकरच्या खूप गोष्टी असतात, त्यापैकी एक माझी आवड म्हणजे चित्रकला.

             हातात घेतलेली चित्रकला पूर्ण होत पर्यंत माझ मन शांत नसते. हातात पेन्सिल घेण्यापासून ते शेवटचं रंगकाम करून पाण्यात ठेवलेला ब्रश, इतक्या काळात वेळेचं भान नसते, भूक लागली हे सुद्धा कळत नाही, बाकी काम राहील बाजूला पण चित्र पूर्ण होत पर्यंत मी त्या चित्रात गुंतले असते.

            एक चित्र काढायला, रंगवायला साधारण ३ ते ४ तास लागतातच. हा वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही आणि त्यात सतत बसून काम करणे, त्यामुळे पाठ दुखू लागते, बारीक काम असेल तर हात सुद्धा दुखून येतो. एकदाच चित्र पूर्ण झालं की शरीराला आराम दिल्यावर मिळणार समाधान खूप वेगळ असते.

            शरीरात वेदना झाल्या असतील तरीही त्यापेक्षा चित्र पूर्ण झाल्याचा आनंद जास्त असतो त्यामुळेच याला उल्हासदायी वेदना म्हणतात. एखादी गोष्टीची मनापासून आवड असल्यास ती पूर्ण होत पर्यंत सतत प्रयत्न केल्यास मिळणाऱ्या फळाची चव गोडच लागते. ती कला असो वा गिर्यारोहण असो किंवा आपले छंद.......

Monday, June 10, 2024

वेळेचे नियोजन 🕐

           आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला सारखाच वेळ मिळतो. त्यात वेळेचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीला यश लवकर मिळत.

           वेळेचे नियोजन का आवश्यक आहे ? गेलेली वेळ परत मिळत नाही. वेळेचं महत्त्व अन्यसाधारण आहे. थोर पुरुष वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाही. कमी वेळेत आपली कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन गरजेचं असते.

            रात्री झोपण्याआधी उद्याच नियोजन करणे गरजेचं असते. कोणत्या गोष्टीला किती वेळ द्याला हवा हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपल्याला कोणती कामे करायची आहे आणि त्या साठी किती वेळ लागेल याचा अंदाज असल्याने दुसऱ्या दिवशी विचार करण्यात वेळ जात नाही.
           व्यक्तीला काम नसले की माणूस विचार करत बसतो. म्हणून त्यापेक्षा स्वतःला कामात गुंतवून ठेवणे हे उपयोगी ठरते.
रोजचे १० मिनिट स्वतःचा विचार केला तरी भविष्यात त्या १० मिनिटांचा परिणाम दिसेलच. 

           आयुष्यातला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. एका सेकंदाला वाया घालवता कामा नये. जितका ज्ञान मिळवता येईल तितका मिळवण्याचा प्रयत्न करायचं. आजच्या काळात सोशल मीडियाला बळी पडणारे भरपूर आहेत. आपला मौल्यवान वेळ केवळ जिथून ज्ञान मिळते त्यातच वापरावा.

Sunday, June 02, 2024

चालतं बोलतं जीवन

                सर्वांच्या जीवनात संघर्ष असतोच. आपल्या जीवनाची दुसऱ्याच्या जीवनाशी तुलना होऊ शकत नाही. सर्वांच्या जीवनात वेगळे प्राधान्य असते, स्वतःचे समस्या असतात आणि त्यावर स्वतःचे उपायपण असतात. सर्वांसाठी जीवन हे सारखे नसते. जीवनात घडून गेलेल्या गोष्टींमधून शिकवण घेऊन समोर पाऊलवाट करणे हे महत्त्वाचे ठरते. परिपक्वता ही वयामुळे येत नसते ती अनुभवातून येते. नक्की परिपक्वता म्हणजे काय ? जेव्हा तुम्ही तुमच्या सभोवताली काय घडते आहे याबद्दल जागरूक असता, जेव्हा तुम्हाला माहित असते काय बरोबर आहे काय चूक आहे, जेव्हा तुमचं पूर्ण लक्ष स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या चांगल्या साठी विचार करत असते.

              आतापर्यंत जीवनात अनेक अडचणी आल्या, चढ उतार आले. नेहमी अभ्यासात मग्न होऊन कायम टॉप करणारी मुलगी ते जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत , नवीन गोष्टी आत्मसात करणारी मी एक पूर्णपणे नाही पण स्वतंत्र स्त्री बनली आहे, आणि हा प्रवास घाटात असणाऱ्या वळणांप्रमाने होता.

                जीवन जगताना मिळालेली शिकवण मी ह्या ब्लॉगमध्ये लिहिते आहे. एक न एक दिवस सर्व ठीक होईल हे अनुभवातून शिकायला मिळाले. देवाचं सगळीकडे लक्ष असते, आपण काय क्रिया, प्रतिक्रिया करतो हे सर्व देवाला ठाऊक असते. आपण आज जरी एखाद्या गोष्टीवरून काळजी करत असू ती एक दिवस नक्कीच काळजी मिटेल. प्रत्येक वेळेस आपले निर्णय बरोबर असतीलच असे नाही कधी ते चुकतात पण तीच चूक आपल्या हातून घडली हे मान्य करणे आणि तीच चूक परत न करणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे.

             एक मुलगी म्हणून प्रत्येक क्षणाला स्वतःला सावध ठेवणे खूप गरजेचे आहे.  सार्वजनिक ठिकाणी वावरताना क्षुद्र लोक आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, वेळ काय झाली असे प्रकारचे प्रश्न विचारतात या गोष्टींना बळी न पडता तिथून काढता पाय घेऊन सावध राहण्यात जबाबदारी आहे. 

                प्रत्येक गोष्टीला होकार द्यालाच हवा अस काही नसते. नकार द्यायला पण शिकायला पाहिजे. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्याला नकार देताना विचार करावा लागतो पण आपण स्वतःला महत्त्व द्यायला पाहिजे आणि आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीला सरळ नकार देता आला पाहिजे. सर्वांच्या मदतीला आपण धावून जायचं पण आपल्या मदतीला कोणी नाही असं नको व्हायला.

              कधी कधी मनात विचार येतो ४ वर्षापूर्वी सोशल मीडिया न वापरण्याचा निर्णय हा सर्वात अचूक होता. सोशल मीडिया हे एक जाळं आहे. तरुण पिढीसाठी हे एक व्यसन होत चाललंय. तास न तास कसे चालले जातात याच भान राहत नाही. एखाद्या व्यक्तीची चांगली पोस्ट बघितल्यास आपलं जीवन अस का नाही ? किंवा मी त्या व्यक्तीसारखी का नाही ? हे विचार करून मनात मत्सर निर्माण होतो. हे सर्व थांबायला हवं. सर्वांना एक अमूल्य जीवन मिळालेलं आहे. आपल्या अमूल्य वेळेला या सोशल मीडियाच्या नादात वाया घालवता कामा नये.

          डोळे बंद करा आणि कल्पना करा तुम्हाला काय करावं वाटते मी पण केलं, माझं ह्रदय म्हणालं तू चित्र काढ मी काढलं नंतर परत कल्पना केली , माझं ह्रदय म्हणालं तुझ्या आयुष्यात तू रंगबेरंगी रंग भर, मी रंगकाम केलं. मी परत कल्पना केली, माझं ह्रदय म्हणालं तू एक वाद्य शिकायला पाहिजे आणि मी शिकायला सुरुवात केली. मी परत कल्पना केली माझं हृदय म्हणालं तू नाच, तू गाणं म्हण, तू स्वयंपाक कर, तू भरतकाम कर...... आणि मी माझ्या हृदयाचं ऐकत सर्वच केलं.

           मी हे सर्व केलं कारण मला करायचं होत, माझी आवड आहे, त्यातून मला खूप आनंद आणि समाधान मिळते. माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता २ वर्षात ६३ ब्लॉग्ज मार्फत वेगळे वेगळे विचार मांडण्यात आले. 
 
           देवा, इतक्या अडचणी का आहेत माझ्या जीवनात ? असा प्रश्न केल्यास उत्तर काय असेल ? देव म्हणतात तू जर रात्रीचा अंधार बघितला नाही तर तुला सूर्याचं महत्त्व कस कळेल तसच जीवनात अडचणी आल्या नाही तर तुझ्या जीवनातील सुखाच्या क्षणात आनंद कसा मिळणार. त्यामुळे प्रत्येकाला आपली सुख दुःख सांभाळून जीवन जगावे लागते.

        अर्थात कितीही बिकट परिस्तिथीला मात करण्यासाठी जिद्द, कसोटी असावी लागते, ताण तणाव न घेता आनंदाने जीवन जगण्यात काही वेगळीच मजा आहे.




चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...