Thursday, August 14, 2025

जीवन हे क्षणभंगुर

खुदकी खामिया देखते देखते, खुदको ना खो देना
सबकी मंजिले अलग अलग, किसीकी ईर्ष्या ना करना


               प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी आहे. कोणाला जन्मजात सर्व मिळत असते तर कोणाला ते सर्व मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. समोरच्या व्यक्तीकडे असणारी वस्तू आपल्याकडे नाही याची नाराजी प्रत्येक व्यक्तीला होतेच हा निसर्गाचा नियम आहे. कोणाला लवकर यश मिळते तर कोणाला उशिरा मिळते. अश्या अनेक गोष्टी आहे ज्यामुळे आपण स्वतःची तुलना ही समोरच्या व्यक्ती सोबत करतो. त्या भौतिक, मानसिक गरजाही असू शकतात. तुलना करता करता आपण स्वतःला कमी समजायला लागतो आणि समोरच्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या करू लागतो. 

          आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून जीवन जगण्याला अर्थ आहे. आजच्या आधुनिक काळात पैसा, गाडी, बंगला, नाव, नोकरी या गोष्टींना माणुसकीपेक्षा मोठा दर्जा दिला जातो आहे. कितीही काळ गेले तरी ज्या व्यक्तीत माणुसकी आहे तोच देवाला प्रिय असतो. 

          आपल्या परिस्थितीची माणसाने नेहमी जाण ठेवावी आणि समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीची थट्टा करू नये. सर्व गोष्टी या आदराने घ्याव्या. त्यातच आपली खरी माणुसकी दिसून येते. आपण स्वतः स्वकष्टाने, मेहनतीने कस मोठं होऊ याचा विचार करू समोरचे पाऊल टाकावे.

Saturday, June 28, 2025

कन्यारत्न

       मुलगी होणे म्हणजे माता पित्यांसाठी वरदान आहे आणि जीवनातील सर्वात मोठे दान म्हणजे कन्यादान आहे. ज्या माता पित्याला कन्यारत्न प्राप्त होते, त्यांनाच हे दान करण्याचे पुण्य मिळत असते. कन्यादान हे म्हणजे लग्नातील एक विधी. संपूर्ण जीवन जवळ असणारी आपली मुलगी आता दुसऱ्या घरी वास्तव्य करणार, सासरी आपल नवीन जग निर्माण करणार या भावनेने व्याकुळ असले तरीही मुलीचे लग्न हे योग्य वयात होणे हे गरजेचे आहे.

           जस व्यक्तीच शिक्षणाचं, नोकरीच एक वय असतं तसंच लग्नाचं वय पण असतं. वेळेत लग्न झाल्यास समोरील आयुष्य कस जगायचं, समोरील आपले नोकरी विषयक निर्णय कसे घ्यायचे, कुटुंब नियोजन कसे करावे हे प्रश्न नवीन पिढी समोर उभे राहतात.

           कोवळ्या वयात असणार चेहऱ्यावरच तेज हे कमी होत जात. आज स्त्री आणि पुरुष हे जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असले तरीही एक गोष्ट अशी आहे जी फक्त स्त्री करू शकते ती म्हणजे बाळंत होणे आणि ही एक स्त्री जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया एका विशिष्ट काळापर्यंत होत असते. लग्नाला उशीर झाल्यास या गोष्टीच नुकसान या नैसर्गिक प्रक्रियेत होते. आणि यामुळे त्या स्त्रीला वेदना सहन कराव्या लागतात. बाईच बाईपण हे खर याच प्रक्रियेमुळे होते. 

           जस शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची ओढ लागते तशीच नोकरी मधे स्थिर झाल्यावर लग्नाची ओढ लागते. आपण ही एक नवीन बंधनात बांधले जावे. जे प्रत्येक मुलीच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो आनंदोत्सव सारखा पार पाडावा हीच इच्छा असते. नवीन कुटुंबाने आपल्याला आपलेसे करावे आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीत साथ देणारा साथीदार हा प्रामाणिक, निर्व्यसनी, चांगली वागणूक, जबाबदारी सांभाळणारा आणि काळजी घेणारा असावा असच वाटते. 

           लग्नाचे वय झाल्यास मुलीच्या मनात खूप विचार येत असतात. त्या विचारांना बोलण्याची संधी मात्र मिळत नाही पण हा संवाद प्रत्येक घरी व्हायला हवाच. शिक्षण घेतल्यावर सुद्धा बाकीना नोकऱ्या मिळाल्या पण मला नाही मिळाली याची खंत आणि मनात तळमळ असते तसंच आपल्या बरोबरील सर्व संसारात मग्न पण आपण मात्र नोकरी आणि नोकरीच करत आहोत या भावनेने मनाला खंत वाटते आणि मन खायला उठते.

       लोकांकडे बघून जगणे असा संदेश नाहीच पण जीवन हे एकदाच मिळते आणि त्या जीवनात आपण आपल्याला मनातून वाटणाऱ्या गोष्टी केल्यास त्याचा आनंद हा द्विगुणित होतो. शेवटी तात्पर्य हेच की मुलीच्या इच्छेप्रमाणे सर्व होऊ द्यावे, शेवटी संसार हा तिलाच करायचा असतो.

Sunday, May 04, 2025

आकाशातले मोती

            निसर्ग हा किती निराळा आहे. निसर्गाचं प्रत्येक रूप हे माणसाच्या जीवनाशी निगडित असतं. निसर्गाचं वेगळं रूप, वेगळे रंग, त्यातून दरवळणारा सुगंध, आश्चर्यचकित करणारं दृश्य, मनाला तृप्त करणारं आणि डोळ्यांना सुखद अनुभव देणार एक रहस्यमय,अद्भुत देवाची निर्मिती.

           मनाला वेड लावलं तर निसर्गाचे बदल हे नक्कीच जादूचे प्रयोग वाटतील. एकीकडे पृथ्वीला प्रकाशमय करणारा सूर्य आणि दुसरीकडे टपोऱ्या पावसाचे थेंब आणि गारा. आजही पाऊस आला की त्यात भिजावे वाटते, पावसाचा आनंद घ्यावा वाटतो, नाचावे वाटते, पेपर ची होडी करून पाण्यावर तरंगवावी वाटते, लहान मुलाप्रमाणे अल्लडपणा करावा वाटतो. निसर्ग गोष्टच अशी आहे की मनाला मोहून टाकते, प्रत्येकाला प्रेमात पाडेल असा हा पाऊस पृथ्वीला जस गार करतो तस मनाला वेगळ्या भावना सोबत जोडतो.

           प्रत्येक गोष्टीचं विज्ञान जरी माहीत असलं तरीही अल्लड बनून प्रत्येक क्षण साजरा करण्याला वेगळाच आनंद असतो. चक्क उन कडाडणाऱ्या मे महिन्यात आकाशातून पडलेल्या थंडगार गारा हातात पकडता पकडता पाण्यात रूपांतर झाल्या. 

                  त्या गारा सुद्धा काही वेळ साठीच गारा असतात पण नंतर ते पाणी होत, गारा पडल्या की सर्वांना नवल वाटत पण गारांच अस्तित्व मूळ हे पाणीच. अगदी मोत्याप्रमाने दिसत आहे पण वेळ गेल्यावर हातात काहीच उरत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची इच्छा असावी. मन आनंदी असल्यास मोठ संकट सुद्धा दूर करण्याची ताकद येते.


   

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...